आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनिधि
सिडको डंपिंग ग्राउंडच्या प्रदूषणामुळे जनजीवन व निसर्ग चक्र धोक्यात मानवी जीवनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता ...
महाराष्ट्र शासनाचे नवी मुंबई शहर वसवण्यासाठी व विभागाचा विकास होण्याच्या दृष्टीने 1970 ला रायगड, ठाणे जिल्ह्यातील हजारो एकर जमिनी संपादित केल्या व त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प आणले .
तळोजा एमआयडीसी विभागात नवी मुंबई वसावण्यासाठी मोलाची भूमिका निभावणाऱ्या सिडकोने सुंदर शहराची संकल्पना मांडून शहर बसविले.
परंतु या शहराचा निघणारा कचरा विल्हेवाट लावण्यासाठी तळोजा एम. आय.डी.सी. विभागातील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट शेजारी आणला जातो. या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया न केल्यामुळे या भागात नेहमी दुर्गंधी पसरलेली असते.
तसेच या भागात मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीसह कैराव केमोफॉर्ब, वेदांत डायस्टफ यासारख्या अनेक कारखाने व वेगवेगळे प्रकल्प उभे राहिले आहेत .
या कारखान्यामधून निघणारा विषारी धूर, केमिकल युक्त सांडपाणी , कंपन्यातून निघणारे दुर्गंधीयुक्त वास यामुळे घोट कॅम्प घोट कोयना वेळे, सिद्धी करवले, तळोजे मजकूर, भोईर वाडा, गोंधळी वाडा, नागझरी चाळ, तोंडरे , सिडको फेज 1 व 2 , पेंधर या लगतच्या गावातील पारंपारिक पाणीसाठा तसेच बाजूने वाहणाऱ्या नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे.
या सगळ्याचा परिणाम येथील मानवी जीवन , पशुपक्षी , निसर्ग यांच्यावर झालेला आहे . यामुळे नदीपात्रात पारंपारिक होत असलेली मासेमारी व शेती ही संपुष्टात आली असून स्थानिक बेरोजगार होत आहेत.
प्रदूषण पसरवणाऱ्या कारखान्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळांचे नियंत्रण नसल्याचे जाणवून येते. त्यामुळे या कंपन्यांकडून सर्रास प्रदुषन युक्त घटक प्रक्रिया न करताच टाकले जातात . परिणामी येथील मानवी जीवन व निसर्ग धोक्यात आले आहे. याचे रक्षण करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी गावदेवी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हरिचंद्र कोळी , खजिनदार रुपेश प्रधान , रमेश पाटील यांनी शासनाकडे केली आहे.
वेळीच प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर कारवाई केली नाही तर गावदेवी सामाजिक संस्था व परिसरातील सर्व जनता एकत्र येऊन मोठे आंदोलन उभारण्याची तसेच आवश्यकता वाटल्यास आमरण उपोषण करण्याची माहिती अध्यक्ष हरिश्चंद्र कोळी यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment