आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनीधी / पनवेल
महिला उत्कर्ष समितीच्या लेकींचे न्यायासाठी पोलिसांना निवेदन....
नवी मुबईतील बेलापूर येथील विवाहिता अक्षता म्हात्रे या 30 वर्षीय महिलेचे पती आणि सासू सोबत भांडण झाले म्हणून ती घरातून निघून कल्याण जवळील शिळफाटा येथील श्री गणेश घोळ मंदिरामध्ये गेली.
त्यावेळी रात्री मंदिरात एकटी असलेल्या अक्षताला मंदिरातील तिघा सेवेकऱ्यांनी भांगेच्या गोळ्या असलेला चहा पिण्यासाठी दिला होता.
ज्यामुळे नशेमध्ये असलेल्या अक्षतावर तीनही आरोपींनी मंदिरातच आळीपाळीने जबरी बलात्कार केला. काही वेळानंतर शुद्धीवर आलेल्या अक्षताने आरडाओरड करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण आरोपींनी अक्षताला मारहाण करत तिचे डोके जमिनीवर आपटून गळा दाबून तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
अतिशय संताप जनक व राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या तसेच महिलांची सुरक्षा ऐरणीवर टांगणारा हा प्रकार असून त्याचा निषेध करावा तितका कमीच आहे.
अशा नराधम नीच प्रवृत्तीच्या मानसिकतेला लगाम बसावा तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता महिला उत्कर्ष समितीच्या राज्यभरातील सदस्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले.
महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेश अध्यक्ष डॉ. स्मिता पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना तर कार्याध्यक्ष श्रुती उरणकर , उपाध्यक्ष आरती पाटील ,सचिव एडवोकेट दिव्या लोकरे , कोकण अध्यक्ष ज्योतीका हरयाण, संघटक नीता माळी, नवी मुंबई अध्यक्ष सुजाता कडू , कार्याध्यक्ष वर्षा लोकरे , पुणे अध्यक्ष ज्योती गायकवाड , सिंधुदुर्ग अध्यक्ष दीपा ताटे , सदस्य श्वेता तांडेल, शोभना जाधव, वंदना बामणे , मीरा जाधव, नारी शक्ती संघटनेच्या विजया कदम यांच्यासह राज्यभरातील विविध महिला सदस्यांनी पोलीस प्रशासनाकडे अशी मागणी केली की
जरी गुन्ह्यातील आरोपींना अटक झाली असली तरी हा खटला जलदगती कोर्टात चालवून दोषी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन त्यांना फासावर लटकवण्यात यावे ज्यामुळे समाजात अशा घटना करण्यास कोणी धजावणार नाही तसेच कायद्याची जरब राहील.
Comments
Post a Comment