आवाज कोकणचा / नवी मुंबई
उरण /प्रतिनीधी
महिला उत्कर्ष समिती नवी मुंबई अध्यक्ष सुजाता दि. कडू व श्वेता तांडेल यांनी बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसह दिले पोलिसांना निवेदन....
नवी मुबईतील बेलापूर येथील विवाहिता अक्षता म्हात्रे या 30 वर्षीय महिलेचे पती आणि सासू सोबत भांडण झाले म्हणून ती घरातून निघून कल्याण जवळील शिळफाटा येथील श्री गणेश घोळ मंदिरामध्ये गेली. त्यावेळी रात्री मंदिरात एकटी असलेल्या अक्षताला मंदिरातील तिघा सेवेकऱ्यांनी भांगेच्या गोळ्या असलेला चहा पिण्यासाठी दिला होता. ज्यामुळे नशेमध्ये असलेल्या अक्षतावर तीनही आरोपींनी मंदिरातच आळीपाळीने जबरी बलात्कार केला. काही वेळानंतर शुद्धीवर आलेल्या अक्षताने आरडाओरड करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण आरोपींनी अक्षताला मारहाण करत तिचे डोके जमिनीवर आपटून गळा दाबून तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
अतिशय संताप जनक व राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या तसेच महिलांची सुरक्षा ऐरणीवर टांगणारा हा प्रकार असून त्याचा निषेध करावा तितका कमीच आहे.
अशा नराधम नीच प्रवृत्तीच्या मानसिकतेला लगाम बसावा तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता महिला उत्कर्ष समितीच्या नवी मुबई अध्यक्षा सौ. सुजाता कडू व श्वेता तांडेल यांनी न्हावा शेवा पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्त बंदर विभाग न्हावा शेवा यांना निवेदन दिले.
यावेळी सौ अपर्णा धर्मेंद्र कडू, सौ पिंकी कडू , सौ प्रीती चं. कडू सौ. रंजना ह . तांडेल उपस्थित होत्या. यावेळी दिलेल्या निवेदनात पोलीस प्रशासनाकडे अशी मागणी केली की जरी गुन्ह्यातील आरोपींना अटक झाली असली तरी हा खटला जलदगती कोर्टात चालवून दोषी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन त्यांना फासावर लटकवण्यात यावे ज्यामुळे समाजात अशा घटना करण्यास कोणी धजावणार नाही तसेच कायद्याचा जरब राहील.
Comments
Post a Comment